Wednesday, February 8, 2012

किंमत

नवीन वर्षातला एक महिना बघता बघता उलटून गेला. दुसऱ्या महिन्याचा दुसरा आठवडाही सुरु झाला.
म्हटलं तर बराच काळ म्हटलं तर एक-दीड तर महिना. काळाची गती इतकी तुफान आहे की जणूकाही पापण्या लवायच्या आत दुनिया प्रचंड बदलेल इतकी प्रचंड गती जाणवते कधीकधी. होत्याचं नव्हतं व्हायला तसं म्हटलं तर एक क्षणही पुरेसा असतो. मग एक आठवडा काय चीज आहे!



माणसं हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग. आपल्या आजूबाजूला असतातच सदैव. त्यात काय? पण त्याचं महत्त्व, त्यांच्या अस्तित्वाचा तुमच्या आयुष्याशी जोडलेला धागा कुठलीतरी परिस्थिती आल्यावर प्रखरपणे जाणवून देण्याची सोय निसर्ग आपोआपच करीत असतो. तुमच्या ध्यानीमनी नसताना तुमच्यावर सदैव कुणावरतरी विसंबून राहण्याची वेळ येते. आपल्या आजूबाजूचे लोक आपल्यासाठी चोवीस तास कुठल्या न कुठल्या प्रकारे त्यांची स्वतःची कामे बाजूला सारून धावत पळत असतात.  तेही विनातक्रार. चेहऱ्यावरती कसलाही थकवा जाणवू न देता. घरापासून आपण हजार किलोमीटर लांब असलो तरीही निश्चिंत आहोत. ही भावना केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे मनात असते. रक्ताची नाती तर असतातच, पण मनाची नाती बांधली गेली तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात आपण असलो तरी एकटे नाहीयोत ही भावना खूप सुखावून जाते.

गेल्या महिन्यातलं माझं आजारपण या सगळ्या लोकांची किंमत मला शिकवून गेलं.  या सगळ्यांसाठी धन्यवाद हा शब्द खूप वरवरचा, त्रोटक आणि कोरडा वाटतो. 'Thank you' हा शब्द आजकाल इतक्या सर्रासपणे रोजच्या वापरत असतो की आताशा त्यातला खरा रस निघून गेल्यासारखाच वाटतोय. असो. इतकंच म्हणेन की सगळ्यांनी माझ्यासाठी जे केलं त्याचा विसर मला कधीच न पडो.




आपण आपल्या शरीराला तसं नेहमीच गृहीत धरत असतो. कधी कल्पना नाही करवत की एखादा अवयव जर निकामी झाला तर किती अडचणींचा सामना करावा लागेल. इतकं कशाला, साध्या आपल्या हाताच्या एका म्हटलं तर क्षुल्लक, अशा शिरेने जर असहकार पुकारला तर किती वाट लागू शकते याचाही प्रत्यय मला नुकताच आला. सलाईन दिल्यानंतर जेव्हा ती शीर सुजली आणि हात हलवताना नाकी नऊ येऊ लागले तेव्हा जो झटका बसला तो बसला.किंमत कळते ती अशीही.



आपण बऱ्याचदा इतक्या वेगळ्या विश्वात वावरत असतो की मृत्यू हे अंतिम सत्य आहे वगैरे वगैरे तत्वज्ञान खरं आहे हेच विसरायला होतं. जाणवतही नाही की आज आपण ज्या व्यक्तीशी बोलतोय, हसतोय, गप्पा मारतोय तो कदाचित् काही दिवसांतच या जगातून जाणार आहे. जाणवेल तरी का? आणि कशाला? पण तरीही चुटपुट लागून राहते. बातमी ऐकल्यावर विश्वास बसत नाही. हीच का ती व्यक्ती? गेल्याच तर रविवारी
आपण भेटलेलो. गप्पा मारल्या. कितीतरी गोष्टी ठरवल्या. आणि आज ऐकतोय की ती या जगातून गेली! अचानकच! संपले म्हणे तिचे या जगात घ्यायचे श्वास. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जन्माला येतानाच हे ठरलेल असतं. काहीही. पण वाट्टेल तेव्हढा त्रागा करा, चीडचीड करा, रागराग करा.. शेवटी आपल्या हातात काहीच नाही. भांडायचं तरी कुणाशी? देव अस्तित्त्वात आहे का नक्की ? जाऊन भांडता तरी येइल! ही काय पद्धत आहे का माणसाला उचलायची? जाऊ देत. आपण जाऊच द्यायचं. आणखी करणार तरी काय म्हणा.
व्यक्ती गेली की मग एक एक गोष्ट आठवत राहते. अरेच्चा हे तर सांगायचच राहून गेलं, पुन्हा एकदा मुदुमलाईला बोलवायचं राहून गेलं. कसले प्लान्स आणि काय.
LIFE IS SOMETHING THAT HAPPENS TO YOU WHILE YOU ARE BUSY MAKING OTHER PLANS. हेच खरं.
असेही झटके मिळतात. किंमत कळते ती अशीसुद्धा!




नवीन नाती सतत जोडली जात राहतात. आपण खुशीत असतो की वाह, क्या बात है! आपण किती भाग्यवान आहोत. आपल्याबरोबर आपली इतकी माणसं आहेत. भाग्यवान असतो आपण हे नक्की. पण ते भाग्य कदाचित आधीच्या माणसांच्या दुरावण्याशी जोडलेलं असतं कदाचित.


8 comments:

  1. मस्तच व्यक्त झालीयेस...
    "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा", हेच खरं

    ReplyDelete
  2. Tu mhantes te khara ahe agdi....apan kevdhya goshtinna gruhit dharto yaar. Naveeen mitra milale, ki junya mitranpasun halu halu dur hot jaato. Eka manasachi, tya relationship chi kimmat velet kalna he kharach khup important ahe.aplyala kharokhar olakhnari vyakti bhetna itka avghad asta yaar...ashya lokanna gamvun chalnar nahi!!!

    ReplyDelete
    Replies
    1. ho na aga, pan vel aalyashivay kadhi janavat nahi ga.

      Delete
  3. Mast post !
    ani ek goshta mala farach awadali ti mhanje, he post wachtana pratyek manus tya post shi tyache experiances correlate karu shakto. :)

    Vishal

    ReplyDelete
    Replies
    1. :-) Nakkich. sagalyanchya babtit he ase prasang thodyaphar pharakane ghadat asanarach.

      Delete
  4. khupach chaan post ahe hi. vishal mhanto tasa, swatahachya anubhavanshi satat referencing hota vachtana. and the best part is, i didnt just think about past experiences, but even wondered whether in my present life i value all those i meet, all that i have or do or experience :)

    ReplyDelete