Thursday, November 17, 2011


रविंद्रनाथ टागोर. या माणसाबद्दल बऱ्याच लोकांकडून बरंच काही ऐकलं होतं. या माणसाला, याच्या साहित्याला, लोक इतकं का मानतात, हे आतापर्यंत कधी कळलं नव्हतं. किंबहुना कळून घ्यावं अशी मनापासून कधी इच्छा झाली नव्हती. बंगाली साहित्य आणि रविन्द्रनाथ टागोर यांची नावं जोडीनंच घेतली जातात. इतरही अर्थातच कितीतरी साहित्यिक असतीलच; परंतु रविन्द्रनाथांना जे प्रेम, जो नावलौकिक लाभला तितका इतर कुणाला क्वचितच लाभला असेल.(आणि असल्यास केवळ माझ्या अज्ञानातून आलेलं वरील स्वगत आहे असं समजून घेण्यास हरकत नसावी).
पु. ल. देशपांडे हे मराठी साहित्यातलं अग्रगण्य नाव. बंगाली भाषा शिकण्यासाठी आणि नंतर रवीन्द्रनाथांच्या साहित्याचा अभ्यास करण्यासाठी ते खास बंगालला जाऊन राहिले होते हे ऐकल्यावर त्यांच्याविषयी वाटणारा आदर आणखी वाढला होता. त्यांच्या शान्तिनिकेतनाताल्या मुक्कामाताल्या अनुभवांवर आधारलेलं ‘मुक्काम शांतीनिकेतन’ हे पुस्तक काही दिवसांपूर्वी हातात पडलं. या पुस्तकात मुख्यतः पु लं च्या नजरेतून रविंद्रनाथ जाणवत राहतात. रवीन्द्रनाथांच्या साहित्यातले स्फुट उतारे, त्यांच्या कविता, काही पत्रे यांचा अनुवाद पु लं नी केलाय. अनुवादावर पु लं ची छाप जरी असली तरी रविंद्रनाथ या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे निरनिराळे कंगोरे दिसत राहतात. विशेषतः निसर्गाशी जवळीक साधून राहिलेले ते निसर्गाविषयी आपलेपणा दाखवताना जगावं कसं; याबद्दल जाता जाता अत्यंत सोप्या भाषेत खूप काही शिकवून जात आहेत असं सतत जाणवत राहतं. एका वेगळ्याच दृष्टीकोनातून मग आपण आपल्या आयुष्याकडे पहायला लागतो. 

नाथांच्याच भाषेत सांगायचं तर:
...कोण मला काय बोललं, कोण मला काय समजलं, हे काय जगात सर्वांहून अधिक मोठं? माझ्या डोळ्यातली क्षणभराची दृष्टीशक्ती ही किती प्रचंड गोष्ट आहे! एक वेळ नुसता श्वासोच्छवास घेण्याची माझी शक्ती ही केव्हढी आश्चर्यकारक घटना! माझ्या मते, ह्या परम आश्चर्यकारक वस्तुस्थितीला कुठलंही दुःख मलीन करू शकणार नाही.
.. वाटतं जीवनातल्या प्रत्येक सूर्योदयाला ओळखीच्या नात्याने नमस्कार करायला हवा आणि प्रत्येक सूर्यास्ताला जिवलग मित्रासारखा निरोप द्यायला हवा. इतक्या सुंदर रात्री माझ्या जीवनातून रोज निघून चालल्या आहेत.-ह्या सगळ्या काही मी धरून ठेवू शकत नाही. हे सारे रंग, हा प्रकाश, ह्या छाया हा आकाशव्यापी निःशब्द महोत्सव, ही ध्युलोक आणि भूलोकाच्या मध्ये असलेली, सारं शून्य परिपूर्ण करणारी शांती आणि सौंदर्य ह्यांसाठी काय कमी पूर्वतयारी(आयोजन) चालली असेल? उत्सवाचं क्षेत्र केव्हढ विशाल? बाहेर एव्हढं आश्चर्यकांड चाललय आणि आमच्या आत मात्र ती हाक ऐकूही जाऊ नये. जगापासून इतकी फारकत घेऊन आम्ही जगतो आहो?  लक्ष लक्ष योजनांच्या अंतरावरून लक्ष लक्ष वर्षांपूर्वी अनंत अंधकाराच्या वाटेनं प्रवास करत एखाद्या तारकेचा प्रकाश ह्या पृथ्वीवर येऊन पोहोचतो आणि आमच्या अंतरात येऊन तो प्रवेश करू शकत नाही- जणू काय तो आणखीही लक्ष योजनं दूर! 


अस काही वाचलं की जाणवतं; की आपली दुःख, आपल्या समस्या आपण किती कवटाळून बसतो!  मी, माझं हे, माझं ते, मला यानं दुखावलं, इत्यादी इत्यादी अत्यंत छोट्या गोष्टीमध्ये गुरफटून जाताना आपण हे विसरूनच जातो की यापलीकडेही जग आहे. चार भिंतीत बंदिस्त किती सहजतेन करून घेतो स्वतःला आपण!


काल सहज रात्री आकाशाकडे नजर गेली आणि खरंच जाणवलं की हे लक्ष तारे लक्षावधी योजनांचा प्रवास करून आपल्याला भेटायला आले आहेत. तसे ते रोजच येतात; हसतमुखानं त्यांच स्वागत करायचं मात्र राहून जातं..


Tuesday, October 11, 2011

रंगीत तालीम

पत्त्यांचा बंगला..  लहानपणीचा हा एक आवडीचा उद्योग. एकाशेजारी एक त्रिकोणी आकारात पत्ते उभे करायचे. त्यावर अलगद एक एक पत्ता आडवा ठेऊन त्यावर पुन्हा एकदा एक आख्खा मनोरा रचायचा. त्यावर आणखी एक.. त्यावर आणखी एक..हळूच दाराच्या फटीतून.. कधी खिडकीतून येणारी चुकार झुळूक तो कष्टाने उभारलेला मनोरा जमीनदोस्त करायची; तर कधी आपलाच धक्का लागून त्याची धूळधाण व्हायची. हिरमुसलेल मन पुन्हा एकदा ताज्या दमाने बंगला बांधायला निघायचं. न थकता.



आजकाल पत्त्यांचे बंगले नाही बांधले जात.. बांधले जातात ते स्वप्नांचे.. भाबड्या आशेने रचत जातो एकावर एक स्वप्नाचे मनोरे.. कधीतरी कुठलातरी परिस्थितीचा फटका बसतो, आणि त्या स्वप्नाचा मनोरा ढळतो ..कधी पूर्णच कोसळतो तर कधी अर्धवट.
तरीही आपण हरत नाही .. नव्या जिद्दीने, नव्या उत्साहाने तयार होतो.. सिद्ध होतो पुन्हा एकदा ताज्या दमाने नवीन मनोरे बांधायला.. वेगळ्या तऱ्हेची, वेगळी पानं घेऊन..





लहानपणचे  असे खेळ हे पुढच्या आयुष्याला तोंड देण्यासाठीच्या रंगीत तालमीच असाव्यात..

Sunday, September 18, 2011

The Number Sense

Following is a chapter from a book named 'NUMBER: The Language of Science' by Tobias Dantzig - a  Baltic-German Russian-american mathematician ( thanks to wikipedia!).

Initially I was thinking to write a short essay which will describe the essence of this interesting article. But the flawless language and the art of explanation of author forced to change my mind. Better to share the original!

Here it is..

Friday, August 19, 2011

कोलाज

तो निळाशार..
आकाशाचा आरसा
आकाश आपली निळाई न्याहाळत हसत असलेलं जणू

तो अथांग..अपार..
दृष्टी पोहोचेल तिथपर्यंत पसरलेला..किंबहुना त्याच्याही पलीकडे
मर्यादा तर होत्या माझ्याच नजरेला

समोरचं क्षितीज..
आकाश आणि धरणीला विलग करणारं एक धूसर सत्य
अन्‌ तेच क्षितीज..
जणू एक मृगजळ
मी एक पाऊल पुढे टाकलं की तेही टाकी एक हळूच मागे
त्याला कवेत घेण्याचं माझं स्वप्न शेवटी अपुरंच

तो किनारा..
चहूबाजूंनी पाण्याने वेढले जाण्याची उगा दाटलेली अनामिक भीती
फोल असल्याची जाणीव करुन देणारा
मला माझ्या परिचित जगाशी-जमिनीशी जोडून ठेवणारा दुवा

तो धीरगंभीर..
त्याच्या ह्र्दयातून उत्पन्न होणार्‍या लाटा मात्र अवखळ..चंचल
हसत हसत किनार्‍याकडे धाव घेणार्‍या
जितक्या आतुर सामावून जाण्यास
तितक्याच सामावून घेण्यासही..
किनार्‍यावरच्या वाळूशी त्यांचा चाललेला पाठशिवणीचा खेळ
माझ्या पावलांना स्पर्श-सुखावून जात होता

मी किनार्‍यावर..तो समोर..
वरवर भासत होता शांत..स्थिरचित्त
कोट्यावधी जीवांचं घर त्याच्यामधे दडलंय
माझ्या जाणीवेपलिकडचं एक प्रचंड विश्व त्याच्या पोटात नांदतय
लाटांसमवेत किनार्‍यावर येउन पहुडणारे शंख-शिंपले, खेकडे
त्यांच्या अस्तित्त्वाची झलक दाखवून देत होते

दिवस हळूहळू कलू लागला
पौर्णिमेच्या दिवशी जरा लाटांना उत्साहाचं उधाणंच येतं जणू
सुरुवातीची त्याची गाज मंद आवाजात मंत्रपठण केल्यासारखी
त्याचं केव्हा उच्च नामघोषाच्या लयीत-सुरात रुपांतर झालं ते समजलंही नाही

मी हलकेच माझे डोळे मिटून घेतले
बाहेरचा कोलाहल शांत झाला
बाहेरच्या जगापेक्षा वेगळं असं आणखी एक विश्व खुणावू लागलं
ऐकू येऊ लागला एक वेगळा नाद..अंतर्नाद
माझ्या मनातही एक अखंड दर्या सामावलेला आहे...!






Monday, July 18, 2011

नक़ाब


कितने सारे नक़ाब पहन रखे है मैने
चाहा की फ़ेंक दूं सब उतारके कहीं तो

जब करने लगी ऐसा तो जाना
एक एक नक़ाब मेरा एक एक रुप था
कितने सारे चेहरे लेकर घूमती हूं मै
हर एक का अपना अपना रंग था

उन सारे नक़ाबों के तले छुपा
आखिर वह एक सामने आया,
भूला-सा, बिसरा-सा था वह
खुद से कई तरह से अलग पाया

वो जो कभी मेरी पहचान हुआ करता था
आज मेरे लिये अजनबी बन गया है
या फिर किसी नये रंग-रूप के खातीर
मैने ही किसी और हस्ती से रिश्ता सजाया है

.
.
.
.
.
.
चढा दिये फिर सारे एक एक कर के
अब इसी चेहरे की आदत सी हो गयी है।

Monday, May 9, 2011

खेळ मांडियेला..


कधी कधी अतिशय अनपेक्षित प्रसंग घडतात. बरे-वाईट कसेही असोत, काही मनःपटलावर कोरले जातात. सुतराम म्हणतात, तसादेखील संबंध नसताना आपण एखाद्या घटनेचे, प्रसंगाचे साक्षीदार होतो. नशीब - दैव अश गोष्टी सत्य आहेत की नाहीत असे प्रश्न अशा वेळी विचारता उपयोगाचे नसतात. जर त्या अनुभवावर आपलं नाव कोरलेलं असेल तर फक्त आणि फक्त साक्षीभावाने येणार्‍या प्रसंगाला सामोरं जाणं इतकंच आपल्या हातात उरतं.
लहानपणी खेळल्या जाणार्‍या अनेक खेळांपैकी चोर-पोलीस हा एक खेळ. चोर होणं कोणाला मान्य असतं बरं? प्रत्येकाला पोलीसंच व्हायचं असतं. मीही त्यला अपवाद नाही. प्रत्यक्षात मात्र किती अवघड आणि जबाबदारीचं काम आहे हे! एखादी संशयित व्यक्ती खरी की खोटी? कसं ठरवायचं? कुठली कसोटी लावायची? जितकं एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधावं तितकं प्रश्नांच्या गर्तेत अधिकाधिक खोल गेल्यासारखं वाटतं.

हजार प्रश्न. त्याची हजार उत्तरं. काय सत्य? काय असत्य? एक खोटं दुसर्‍या खोट्याला जन्म देतं असं म्हणतात. मूळ खोट्याशी (किंबहुना खर्‍या उत्तराशी) पोहोचावं कसं? बरं ते खरं नाही- खोटंच- हे कशावरून? आपण आपल्या बुद्धीच्या, तर्काच्या मर्यादेच्या बाहेर नाही जाउन विचार करू शकत. आपल्या जाणीवा आपल्याला आलेल्या अनुभवांनी समृद्ध होत असतात. त्यावरुन आपण बाकीचं जग पडताळत, आजमावत असतो. ’पाच आंधळे आणि हत्ती’ ची गोष्ट नाही का? प्रत्येकाला समजलेला हत्ती वेगळाच.
आयुष्याची वेगळी अशी - dark side - ही असू शकते, जिचा अंदाज आपल्याला नसू शकतो. आपल्या चष्म्यातून जग न्याहाळताना याचा विसर आपल्याला पडू शकत नाही का?

एक माणूस. त्याचा संशयास्पद वावर त्याला पोलिसांच्या नजरेत भरवतो. त्यातून निर्माण झालेली चौकशीची गरज. यात अर्थाअर्थी माझा तसा काहीच संबंध नाही. पण निमित्त हे, की संशयित व्यक्ती हिंदी बोलणारी आणि पोलिसाला हिंदीचा गंध नाही. त्यामुळे माझं काम दुभाषीचं. प्रश्नोत्तराची प्रक्रिया माझ्याद्वारे चालू. ही प्रकिया इतकी वेदनामय, की नसती आपल्याला ही भाषा समजत तर बरं झालं असतं असा विचार माझ्या मनात एकदम चमकून गेला. संशय एकदा निर्माण झाला की तो अधिकाधिक बळावतच जातो. तसंच काहीसं यावेळीही झालं. प्रश्नोत्तरागणिक संशय वाढत होता. खरं बोलत असला तरी समजणार कसं? त्यासाठी पर्याय, साधन काहीच नाही. सर्व दरवाजे जवळपास बंद. चौकशी संपली खरी. डोक्यातले विचार मात्र संपले नाहीत. ते थैमान घालतच होते.

’तो’ नक्की कोण? खरा की खोटा? का त्याच्यावर अशी वेळ यावी? नियतीच्या मनात काय आहे नक्की?

काहीही असो. सत्य लवकर सामोरं यावं. सत्याचाच विजय व्हावा अशी अपेक्षा करण्याउपर आपण काहीच करु शकत नाही.

’तो’ कायमचा लक्षात राहील ही गोष्ट मात्र पक्की.
माझ्या लिस्ट मधे उग्गाच आता आणखी एकाची भर पडली आहे.

Friday, February 25, 2011

And it happened again.. after a loooooooong time.. but IT HAPPENED!!

A unique experience...
 
Learning.
A joy of creating; constructing something new.

Doing things which were not too obvious before.
Visualizing facts which were abstract in their own way.


A merry heart..jumping; exactly like a small kid jumps with joy when it watches his kite flying all way up in the sky...

Friday, February 4, 2011

सहप्रवासी

 त्या दोघी, बेंगलोर-पुणे प्रवासात भेटलेल्या. अनपेक्षितपणे लांबलेल्या प्रवासात झालेली मैत्री.. की नुसतीच ओळख??...काहीही असो. सुरुवातीच्या काही तासांमधला तो अलिप्तपणा कधी विरघळून गेला कळलंही नाही. त्यातल्या त्यात ती एक जास्तच बोलकी. तितकीच निरागस. परीक्षा संपल्या संपल्या घरच्या ओढीनं मिळेल त्या गाडीनं जायचं म्हणून त्या गाडीत चढलेल्या. नेमका काही अपरिहार्य कारणांमुळे गाडीला उशीर. सुरुवातीच्या गप्पा अगदी जुजबी. ’ती’ चा ’तो’ ही त्याच गाडीत दुसर्‍या एका डब्यात. त्या दोघी आणि तो.. एक त्रिकोण. ’ती’ दुःखी. माझ्यासारख्या तिर्‍हाईतापाशी ’ती’ नं तिचं मन मोकळं केलं. ’दीदी, तुम ही बताओ मै क्या करूं??’ वर सल्ल्याचीही अपेक्षा. मी काय सल्ला देणार? कपाळ??? शेवटी कसंबसं चारदोन गोष्टी सांगून शांत केलं. प्रवास संपताना माझी पावलं माझ्याच नकळत जड झाल्याचं जाणवलं. ’ती’ने दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधायचा प्रयत्नही केला. संपर्क होऊ शकला नाही.


त्या आजी, त्याच प्रवासात भेटलेल्या. मुलीच्या घरी चाललेल्या. गाडी लेट आहे हे मुलीला माझ्या फोन वरून कळवलं. मुलगी काळजीत. सतत काही वेळाने संपर्क करत होती. व्यवस्थित सुखरूपपणे घरी पोहोचल्यावर पुन्हा त्यानी मला फोन केला. आभार मानण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी..


ते काका, रेल्वेत आम्ही संगणक वापरत असलेला पाहून लगेच त्यानी जुन्या गाण्यांची फर्माईश केलेली. मस्तपैकी गाणी ऐकत झालेला तो लांबलचक प्रवास कधी संपला ते कळलंही नाही.


ती, स्वारगेट-कर्वेनगर या संध्याकाळच्या वेळी रहदारीमुळे तास-सव्वा तास खाणार्‍या प्रवासात भेटलेली. ती च्या मांडीवर एक दोन-एक वर्षाची मुलगी. ’ती’ चांगली एल. एल. बी झालेली. एल. एल. एम ची तयारी करत होती. अगदी संसार संभाळून. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आंतरजातीय प्रेमविवाह. सुरुवातीला सगळे आलबेल. लग्नानंतर मात्र घरच्या बाईने घरची जबाबदारी संभाळावी, माणसांचे हवे-नको ते बघावे असा सूर. माहेरचा आधार तुटलेला. त्यामुळे कात्रीत सापडलेली. त्या तासाभराच्या प्रवासात ’ती’ ने तिची व्यथा माझ्यासमोर मांडली. सांत्वन करण्यापलिकडची अवस्था. माझा थांबा आल्यावर मी उतरले.. ’ती’ मात्र तशीच मनामध्ये घोटाळत राहिली.


’ती’, माझी सख्खी मैत्रीण. तब्बल पाच वर्षे आम्ही एकाच बेंचवर बसायचो. शाळा संपल्यावर वाटा वेगळ्या झाल्या. सुरुवातीला असणारा सम्पर्क हळूहळू कमी होत बंद पडला. अचानक कधी तरी कुणाकडून तिच्या बद्दल समजलं. थोडं वाईटच वाटलं. अजूनही असं वाटतं अचानक ती समोर येउन उभी राहील..’काय ओळखलं का?’ असं विचारेल..आणि मी डोळ्यातलं पाणी हलकेच पुसून हसून म्हणेन.. ’गधडे, कुठे होतीस इतके दिवस??’





आपल्याला सतत वेगवेगळी माणसं भेटत असतात. निमित्त काहीही असो. काहींशी पटकन मैत्र जुळतं. काहींच्या बाबतीत कटू आठवणीही. थोड्या काळासाठी आपल्या आयुष्यात आलेली अशी माणसं. सहप्रवास काही क्षणांपासून काही वर्षांपर्यंतचाही... अचानकपणे अशाच आठवणी येतात.. मनात तरंग उमटवून जातात. काय करत असतील ही सगळीजणं आत्ता? कशी असतील? यापैकी किती जणांनी मला लक्षात ठेवलं असेल? किती जण माझी आठवण काढत असतील? असतीलही कदाचित.

कधी अनपेक्षितपणे त्यांची भेट झाली तर...

Tuesday, January 4, 2011

पुराण

आज टीव्ही वर एक पौराणिक मालिका बघायचा योग आला. मारनचा असल्या सगळ्या मालिकांवर फार जीव आहे. या मालिका तो रोज न चुकता बघतो. त्यामुळे आज मलाही अर्धा तास ती मालिका ’सहन’ करावी लगली. ’सहन’ अशासाठी की, पौराणिक मालिका बघण्यास हरकत नही पण तमिळ मधे चालू असलेली किती वेळ सहन करणार?? अर्थात असल्या मालिका कळायला भाषा यायलाच हवी हे काही बंधनकारक नाही.

बर्‍याच वर्षांपूर्वी ॐ नम: शिवाय, श्रीकृष्ण, विष्णू पुराण आदी खूप मन लावून नियमितपणे मीही बघितल्या आहेतच. आज मात्र त्यावेळी ज्या भक्तीभावाने बघितल्या होत्या त्या भक्तीचा, किंवा निरागस विश्वासाचा कुठेही मागमूसही शिल्लक राहिला नाहीय अस प्रकर्षाने जाणवलं. कारणमीमांसा करायचीच झाली तर -- १) जास्त शिकल्यामुळे शिंग फुटली आहेत, बाकी काही नाही. २) आजकालच्या पिढीचं काय करावं हेच समजत नाही हो.. सगळे असलेच.. जरा रोज देवासमोर हात जोडून शांत बसा म्हटलं तर ऐकायची सोय नाही. देवाची सुद्धा खिल्ली उडवायला कमी करत नाहीत ही आजकालची पोरं...  इत्यादी इत्यादी विधानांपैकी कुठलही एक चिकटवून टाका बिनधास्त!

पण खरंच, अशा मालिकांतून जे चित्र उभं करतात त्यातून इतके भयंकर प्रश्न पडतात की बस्स.

  • या सगळ्या देवांना (अन दानवांना सुध्दा) रात्रंदिवस तो भरजरी पोषाख आणि दागिने घालणं बंधनकारक असतं का? सगळेजणं आपले सदैव कुठल्यातरी लग्नकार्याला निघाल्यासारखे नटलेले. बरं तरं बरं, बायकांची अवस्था म्हणजे आणखी वाईट. असल्या make up मधे रडायला पण लावतात. पण आज तर height च झाली. वामनाचा जन्म झाल्या झाल्या दुसर्‍या मिनिटाला त्याची आई मस्त टकाटक! (पूर्ण make up मधे with all accessories.. I mean jewellery and all...)  अर्थात हा त्या मालिकेच्या दिग्दर्शकाचा प्रश्न आहे म्हणा. देव जर खरच अस्तित्वात असेल तर त्यालाही असले प्रश्न नक्कीच पडत असणार.. अगदी शंभर टक्के!
  • या सगळ्या देवांच्या आणि दानवांच्या hairstyle आणि कपड्यांमधे प्रचंड फरक. देवांचे (आणि देव्यांचे :-)) पोषाख सगळे पांढरे, bright आणि fresh रंगांचे. आणि दानवांचे मुख्यतः काळपट आणि गडद. हा significant difference खरच असेल का हो? हा दानवांवरती अन्यायच नाही का?
  • हे सगळे ऋषी मुनी म्हणा, देव म्हणा, चौकात भाजीला चालल्यासारखे ’काही नाही, जरा स्वर्गात जाउन येतो’ अस सहज म्हणून गेल्यासारखे सगळीकडे हिंडत असतात. चहाला कैलासावर तर नाश्त्याला वैकुंठात. मजाच असते!
  • काही देव/ऋषी either मृगजिनावर किंवा वाघाच्या/ बिबट्याच्या कातडीवर बसलेले असतात म्हणा किंवा त्यापासून बनवलेले वस्त्र परिधान करत असतात. आजकालच्या युगात ते जर असते तर मनेका गांधीनी नक्कीच case ठोकली असती त्यांच्या विरुद्ध.
  • कधी कधी वाटतं, की एखादा राक्षस चुकून रागाच्या भरात ’हे मूर्ख’ वगैरे संस्कृतोद्भव शिव्या देण्याच्या ऐवजी ’u ediot' असं म्हणण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • दानवांची शस्त्रही जाणवण्याइतपत वेगळी असतात बरं का देवांपेक्षा! एखाद्या राक्षसाची तलवार बघा आणि देवाची बघा. उत्तर मिळेल. उत्तराच्या पाठीमागचं कारण मीच अजून शोधते आहे.
  • सगळे देव handsome आणि देव्या beautiful category त, तर दानव शक्य तितके विकृत, विचित्र दाखवले जातात. याला एकही अपवाद सापडणार नाही. बघा शोधून. म्हणजे देवत्व आणि दानव्य हा केवळ physical appearance वरच ठरतो की काय? एखाद्या चांगल्या चेहर्‍याच्या मागे दुष्ट/ क्रूर चेहरा लपलेला असू शकतो ही शक्यता कुठेच consider केली जात नाही. हा दोष कुणाचा?

बरं हे तर झाले मालिकारुपी चित्र उभं करतानाचे दोष. पण आणखी काही technical प्रश्न बरेच आहेत.

  • जेव्हा पृथ्वी समुद्रात बुडवली होती, तेव्हा विष्णूने अवतार घेउन तिला वाचवलं. आता जर पाणी फक्त पृथ्वीवरच अस्तित्त्वात आहे, तर हा आख्खाच्या आख्खा समुद्र आला कुठून? तो आहे कुठे? म्हणजे जर पृथ्वी बुडेल इतका जर समुद्र अस्तित्त्वात असेल तर तो आपल्याला सापडल्याशिवाय राहिला असता का?
  • जर देवाला भविष्यातलं कळतं, तर मग दानवांना वरदान देण्याच्या आधीच काळजी का नाही घेत? बरं एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, पण देवही अशा चुका सारख्याच करताना दिसतात. मग आपल्यसारख्या बापुड्या मनुष्यप्राण्याच्या हातातून चुका झाल्या तर त्यात नवल ते काय?
  • कृष्णाला खरंच अर्जुनाला भगवद्गीता समजावून सांगण्याइतका वेळ कुरुक्षेत्रावर मिळाला? तोवर बाकीचे लोक करत काय होते? मालिकेमधे दाखवताना सोयीसाठी म्हणून मागचे सगळे लोक ’pause’ status मधे दाखवतात. प्रत्यक्षात असं थोडंच असेल?
हे आणि असे बरेच प्रश्न मला सारखेच पडत असतात. आणि मला खात्री आहे की असे प्रश्न पडणारी मी एकटीच नक्कीच नाहीये. उत्तरं शोधायची सध्यातरी मला घाई अजिबात नाही. जोवर त्या उत्तरांवाचून काही अडत नाही तोवर चाललय ते चालू देत हेच माझं धोरण आहे. पण तुमच्याकडे उत्तरं असली तर जाणून घ्यायला नक्की आवडतील. आणि असे अजून प्रश्नही!

P. S. कृपया हा लेख वाचून माझ्या आस्तिकते/नास्तिकते बद्दल शंका काढू नका. जे मनात आहे ते मांडलंय इतकंच. अर्थात १००% आस्तीक माणूसही या शंकांचे योग्य प्रकारे निरसन करु शकेल की नही याबद्दल माझ्या मनात शंकाच आहे.